सिंधुदुर्ग: मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून राजकारण तापलं आहे.
यातच आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत यांचा समावेश आहे. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही सहभाग होता. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर आले. मात्र, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत हे किल्ल्यावर गेलेले असल्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांना राजकोट किल्ल्यावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. त्यामुळे नारायण राणे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.