बारामती : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी असल्याची पाहायला मिळत आहे. राज्यात निवडणुका नेमक्या कधी होणार? याची उत्सुकता मतदारांप्रमाणेच राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लागली आहे. जम्मू-काश्मीर व हरियाणाच्या निवडणुका आयोगानं आधी जाहीर केल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका दिवाळीआधी की दिवाळीनंतर? यासंदर्भात तर्क-वितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यभर मतदारांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूचक विधान केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, सुप्रिया सुळेंसमोर त्यांचा पराभव झाला. खुद्द अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम होणार असे अंदाज वर्तवले जात होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं. त्याचसंदर्भात अजित पवारांनी आज बारामतीमध्ये बोलताना भाष्य केलं.
“मागचं सरकार २०१९ च्या निवडणुकीत २६ नोव्हेंबरला स्थापन झालं होतं. त्यामुळे नवीन सरकार २६ नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे असा एक नियम आहे. निवडणूक आयोग कधी निवडणूक घेईल माहिती नाही. खूप जण निधीची मागणी करत आहेत. पण आता मी निधीसाठी फाईलवर रिमार्क काहीही दिला, तरी तो मंजूर होईपर्यंत आचारसंहिता लागेल. त्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करावा”, असं अजित पवार म्हणाले आहेत.