प्रतिनिधी: गेल्या एक ते दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कधी आंदोलन, कधी उपोषण या मार्गाने मागण्या मांडत आहेत. त्यांना मराठा समाजातून मोठा पाठिंबाही मिळत आहे. मात्र, त्यांनी केलेल्या सगळ्या मागण्या अद्याप शासनदरबारी मान्य न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असून त्याआधी आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“सरकारला संधी म्हणून हे उपोषण” “आम्ही तुमच्याकडे ९ ते १० मागण्या दिल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करा. त्यात कोणतीही अडवणूक देवेंद्र फडणवीसांनी करू नये. ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे, त्यांना आज स्पष्टच सांगतोय. आमच्या नावानं नंतर तक्रार करू नका. तुम्हाला आत्ताच संधी आहे. मला यात राजकारण करायचं नाहीये. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही, तर नंतर आमच्या नावानं आरडाओरड करायची नाही. तुम्हाला संधी म्हणून मी हे उपोषण करणार आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले