सांगरूळ /वार्ताहर:
सांगरुळ (ता. करवीर) चे माजी उपसरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सुशांत ज्ञानदेव नाळे हे आगामी विधानसभा निवडणूकीत ‘करवीर’ मधून चंद्रदीप नरके हे आमदार व्हावेत, यासाठी अंबाबाईला साकडं घालणार आहेत. शुक्रवारी (दि. ४)रोजी सांगरुळ ते अंबाबाई मंदीरापर्यंत ते १८ किलो मीटर दंडवत घालत येणार असल्याची माहीती कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष निवास बातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना निवास वातकर म्हणाले, राजकारण व समाजकारणात काम करत असताना ‘निष्ठा’ महत्वाची मानली जाते. सुशांत नाळे हे गेली वीस वर्षे माजी आमदार चंददीप नरके यांचे निष्ठावंत सेवक म्हणून काम करत आहेत. दरवर्षी कुस्ती स्पर्धासह इतर सामाजिक उपक्रम राबवतात. राजर्षि शाहू महाराज जयंतीचे औचित्स साधून समाजात आदर्शवत काम करणाऱ्यांचा गौरवही ते करतात. संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वयोश्री योजना आदींच्या माध्यमातून सांगरुळ व परिसरातील हजारो महिला व निराधारांना पेन्शन मिळवून देण्याची भूमिका घेतली.
आपला नेता पुन्हा आमदार झाला पाहिजे, ही त्यांची भावना असून त्यासाठी आई अंबाबाईला साकडे घालण्यासाठी ते नवरात्रौत्सव काळात स्वता उपवास करुन दंडवत घालणार आहेत. सकाळी नऊ वाजता ते सांगरुळ येथून निघणार असून साधारणता सायंकाळी पाच वाजता ते अंबाबाई मंदीरात पोहचणार असल्याचे निवास वातकर यांनी सांगितले.
यावेळी, कुंभी कासारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे, कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे, ‘कुंभी’चे माजी संचालक सदाशिव खाडे, ग्रामपंचायत सदस्य शुभम खाडे, जोतिर्लिंग दूध संस्थेचे संस्थापक संभाजीराव नाळे ,राजाराम खाडे, संभाजी नाळे, श्रीधर खाडे, संभाजी नाळे,सौरभ खाडे,आदी उपस्थित होते.



