राधानगरी: –
आपल्याला जो कांही गेले आठ वर्ष वीस, चाळीस व साठ टक्के पगार आहे मिळतो त्यामध्ये प्रचलित नियमानुसार दरवर्षी त्यामध्ये विनातक्रार टप्पावाढ व्हावी यासाठी कोल्हापूर याठिकाणी गेले ६८ दिवस तर मुंबई येथे गेले ५१ दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. याबाबत १२ जुलैला पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात एक जुन २०२४ पासून सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना टप्पा वाढ लागू करतो अशी घोषणा केली मात्र त्याचा जीआर न काढल्यामुळे व तो काढण्यासाठी सदरची आंदोलने सुरु असून आतापर्यंत याकालावधीत पंधराच्यावर मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या.
राज्यातील 67 हजार अंशतः अनुदानित शिक्षकांचा टप्पा वाढीचा निर्णय होईल, या आशेवर आहेत. सरकारच्या नेहमीच्याच आश्वासनांच्या खैरीत आणि वारंवार कॅबिनेटमध्ये सरकार विषय अधांतरीत ठेवत असल्यामुळे शिक्षकांच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. आज मंगळवारी कॅबिनेट होण्याची दाट शक्यता असल्याने या बैठकीत शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्कामोर्तब होते काय? याकडे शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे.
गेल्या वीस दिवसांतील मागील मंगळवारच्या कॅबिनेटमध्येही अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा निर्णय झाला नाही. त्या दिवशी सायंकाळी मात्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि अधिकारी यांची अनुदानाच्या फाईल संदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा आदेश काढण्यात येईल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश काढणारच, असे आश्वासन सरकारने शिक्षकांना दिले आहे.
मंगळवारच्या बैठकीत निर्णय घेणारच -शिक्षणमंत्री
शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत आपली फाईल मंजूर झाली नाही त्यामध्ये काही तांत्रिक बाबी होत्या त्यासाठी सहा दिवसांपूर्वी मीटिंग आयोजित केली होती ती मीटिंग झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री होते यामध्ये जे काही अडचणी, किंवा शंका होत्या त्याबाबत चर्चा होऊन ती फाइल परिपूर्ण झाली.याबाबत परवा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी महत्वाची आक्रमक भूमिका घेतली व त्यांनी शिक्षकांना दिलेला शब्द आजपर्यंत चाललेली चालढकल याबाबत माहिती सांगितली. त्यांनी सांगितले की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आपला विषय निश्चित घेवून जीआर काढला जाईल.




