आदमापूर/प्रतिनिधी
नाधवडे (ता.भुदरगड) येथे दीड-दोन महिन्यापूर्वी पिण्याचा पाण्याचा अशुध्द पुरवठा झाल्याने कावीळ सदृश्य रोगांने अक्षरशः थैमान घातले होते.त्याच पार्श्वभूमीवर सध्या गेली पाच-सहा दिवस पुन्हा अशुध्द पाण्याचा पुरवठा सुरु असल्याने नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने उकळून पिण्याचे आवहान नागरिकांना केले आहे.
नाधवडे येथे कोनवडे येथील वेदगंगा नदीपात्रातील इंटक मधून पाणीपुरवठा होत आहे.पिण्याची पाईप लाईन कोनवडे-नाधवडे मुख्य रस्त्यांच्या बाजूने आणली आहे.ही पाईप लाईन अनेक ठिकाणी गावच्या गटारींना लागून आली आहे.तर गावांतर्गत पाईप देखील गटारींना लागूनच टाकण्यात आली आहे.त्यामुळे सतत पाईपची लिकेज होऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असते.तर कांही ठिकाणी गटारींमधील अशुध्द पाणी पाईप मध्ये शिरत असते.त्यामुळे चावींना गाळ मिश्रीत काळे पाणी येत आहे. शिवाय पाण्यातून शैवाल व दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दीड-दोन महिन्यापूर्वी गावांत अशुध्द पाण्यामुळे कावीळ सदृश्य रोगाने थैमान घातले होते.त्यावेळी आरोग्य खात्याचे पथक गावात ठाण मांडून थांबले होते. कावीळ सदृश्य रोगांने बाधित शेकडो नागरिकांनी गारगोटी,मडिलगे बु।। व मिणचे खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी दवाखान्यात दाखल होत औषधोपचार घेतले होते.त्यावेळी सामान्य कुटूंबांना औषधोपचारासाठी हजारों रुपयांचा नाहक आर्थिक बुर्दंड सहन करावा लागला होता. सध्या तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामस्थांनी खाजगी पाणी सप्लाय करणाऱ्या केंद्रांतून पाणी विकत आणून पिणे पसंद केले आहे.तर सामान्य नागरिक मात्र अशुध्द पाण्याचा पिण्यासाठी सर्रास वापर करित आहेत.त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.