मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत समन्वय नसल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. जागा वाटप विलंबाने झाल्याने आणि योग्य जागा वाटप न झाल्याने महाविकास आघाडीचा राज्यात पराभव झाला असं गणित मांडलं जातंय. यावरून आता महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली आहे. शरद पवारांनीही महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तर, विजय वडेट्टीवार यांनीही विधानसभेच्या परभवाला जागावाटपाला कारणीभूत ठरवलं आहे. आता संजय राऊतांनीही या विषयी वक्तव्य केलंय. महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचंही त्यांनी मान्य केलं.
जागा वाटप विलंबाने झाले, त्यामुळे अस्वस्थता पसरली. कार्यकर्त्यांना काम करायला वेळ मिळला नाही, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार यांची वेदना ही संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. चुका झाल्या आहेत आणि त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं. तेव्हाही आम्ही सांगत होतो. पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. नाना पटोले आणि माझ्यात वाद सुरू होता. पण वाद त्या पद्धतीचा नव्हता. जागा वाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे.”
या जागा वाटपात वडेट्टीवार होतेच. त्यांनी विदर्भातील जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. कारण त्या जागा ते हरले आहेत. चंद्रपूरची जागा किशोर जोरगेवार राष्ट्रवादीतून लढणार होते. यासाठी १७ दिवस राष्ट्रवादीने प्रयत्न केले. पण काँग्रेसने ही जागा सोडली नाही. अखेर किशोर जोरगेवार भाजपात गेले आणि जिंकले. काही लोकांना वाटत होतं की आम्हीच जिंकू. आम्हाल जागा मिळायला पाहिजे. देशातील वातावरण बदललं आहे, वगैरे”, असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली.