मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीसाठीचा पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. कल्याणी समूहाकडून गडचिरोलीमध्ये पोलाद उद्योगासाठी 5,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात कल्याणी उद्योग समूहाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.
कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी 5 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे. त्यामाध्यमातून 4 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला आहे.
स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यंदा भारताने आपले सर्वांत मोठे शिष्टमंडळ त्यासाठी पाठवले असून ही बैठक पाच दिवस चालणार आहे.