घुणकी : ” ध्यान, ज्ञान , शक्ती , वाचन ही चार मंदीरे गाव समृध्द करतात. समृध्दीमुळे वैचारीक, सामाजिक, मानसिक, भावनिक सुपिकता निर्माण होते.” असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव पाटील यांनी येथे व्यक्त केले.
रसिक रंजन वाचनालयाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प “जीवन संघर्षातून,जीवन समृध्दीकडे”
या विषयांवर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वारणा सहकारी दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते होते.पाटील म्हणाले, शिवाजी महाराज, शाहू महाराजांनी संघर्षातून आदर्श समाज निर्माण करण्याचे काम केले. संघर्षाशिवाय प्रगती होत नाही. म्हणून जीवनात संघर्षाशिवाय समृध्दी नाही. तसेच जीवन समृध्द करण्यासाठी वाचन महत्वाचे आहे. २१ व्या शतकात वाचन संस्कृती वाढविण्यासह वाचकांची समृध्दी वाढविण्याचे काम रसिक रंजन वाचनालय करीत आहे.यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी जालिंदर नांगरे, उपाध्यक्षपदी सचिन सिद, वाचनालयाचे सदस्य महेश खताळ यांची आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड झालेबद्दल सत्कार झाला.वारणेचे संचालक राजवर्धन मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी वसंतराव कारंडे, अरविंद टेळे-पाटील,शांतीकुमार पाटील (किणी) संजय पाटील (चावरे),ग्रामपंचायत सदस्या आशा खताळ, भीमराव सिद, वाचनालयाचे अध्यक्ष हिंदूराव पाटील, कार्यवाह संपतराव पाटील, संचालक जयसिंग पाटील, प्रा. अशोक जाधव, प्रा. विजयकुमार पोवार यांच्यासह श्रोते उपस्थित होते.संचालक प्रा. तुकाराम खतकर यांनी स्वागत केले. संचालक शशिकात जाधव यांनी आभार मानले. ग्रंथपाल सर्जेराव मोरे, रमेश शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले.