Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeEducationडॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ; नोबेल पारितोषिक विजेते डॉ....

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ; नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर: 
शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने नोबेल पारितोषिकप्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल व कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे आणि डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, आकुर्डी-पुणे या तीन विद्यापीठांचे कुलपती आणि ६० हून अधिक संस्थांचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच, कृषी, बांधकाम, हॉटेल, रिटेल, सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. संजय डी. पाटील यांचा 61 वा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी ३.३० वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, आमदार सतेज (बंटी) डी. पाटील, श्री. ऋतुराज संजय पाटील, श्री. पृथ्वीराज संजय पाटील, श्री. तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. कैलाश सत्यार्थी हे बालमजुरीविरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील विदिशा येथील डॉ. कैलाश सत्यार्थी यांनी १९८० मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून आपली कारकीर्द सोडून ‘बचपन बचाओ आंदोलन’ची स्थापना केली. मागील चार दशकांपासून ते पीडित बालकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी झगडत आहेत. ‘बचपन बचाओ’च्या माध्यमातून डॉ. सत्यार्थी यांनी आतापर्यंत १ लाखांहून अधिक बालमजुरांचे व पीडित मुलांचे पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. जागतिक पातळीवर देखील बालकांशी संबंधित सामाजिक प्रश्नांवर सत्यार्थी यांनी आवाज उठवला आहे. ‘इंटरनॅशनल सेंटर ऑन चाईल्ड लेबर अॅण्ड एज्युकेशन’ या संस्थेच्या माध्यमातून डॉ. सत्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. लहान मुलांसाठी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय करारांमध्येही सत्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सत्यार्थी प्रथमच कोल्हापुरात येत असून त्यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. या समारंभात डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ‘डॉ. संजय डी. पाटील गौरव ग्रंथा’चे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर डॉ. कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ‘ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन’ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. देशभरातील आजी-माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ञ यांनी उच्च शिक्षण धोरणाबाबतचे विचार या ग्रंथात मांडले आहेत.

दरम्यान, वाढदिवस समारंभापूर्वी दुपारी १२ वाजता डॉ. कैलास सत्यार्थी हे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांशी संवाद साधणार आहेत. हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या या संवाद कार्यक्रमासाठी १०० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News