वाल्मीक कराड हा मोठा नसून त्याला धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचे संरक्षण आहे, असा आरोप आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त करीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दि. १८ फेब्रुवारी रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या सोबत आ. जितेंद्र आव्हाड, सचिन खरात हे मस्साजोग जिल्हा बीड येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. या वेळी त्यांच्या सोबत खा. बजरंग सोनवणे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, महेबुब शेख, सचिन खरात, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, दयानंद स्वामी, डॉ. खळगे होते.
यावेळी बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड हा मोठा नाही; परंतु त्याला धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचे संरक्षण आहे. तो पोलीस कोठडीत असताना सुध्दा पोलीस त्याला हात लावण्यास धजावत नाहीत. सामान्य माणूस पोलीस कोठडीत असताना त्याच्या कमरेला हातात, गळ्यात व दंडात काही ठेवत नाहीत. परंतु वाल्मीक कराड याच्या हातात गंडे-दोरे कसे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड हा आरोपी असल्याने त्याचे व धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा तसेच सर्व आरोपींना फासावर लटकावण्याची मागणी त्यांनी केली आहे.