पुण्यात नुकताच जिबी सिन्ड्रोमने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले होते. दूषित पाणी हे या आजाराचे मुख्य कारण असल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. श्री क्षेत्र देहू येथे १४ ते १६ मार्च २०२५ या दोन तुकाराम बीज सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिल्याचे समजते.
श्री क्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्याकरीता व स्वयंपाकाकरीता उपयोगात आणण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. तथापि, ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. तसेच देहूतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे.
इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतेही कपडे धुवू नयेत, अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करु नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आदेश नमूद केले आहे.