राज्यात विधान परिषद पोटनिवडणूक होणार असून भाजपकडून तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे.
भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात बड्या नेत्यांना डावल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. पुण्याकडून माजी आमदार जगदीश मुळीक यांचे नाव चर्चेत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेवेळी मुळीक यांना शब्द दिला होता. पण त्यांनी तो पाळला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तर काही दिवासंपूर्वी, रिक्त जागांसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे चर्चेत होती. इतकेच नव्हे तर त्यांची नावे दिल्लीलादेखील पाठवण्यात आली होते. तर या यादीमधील केचे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळं ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना पुन्हा एकदा डावल्याची चर्चा सुरु झाली आहे.
माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहेत. 2014 मध्ये सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्त्वाचे पद मिळाले नाहीत. राज्यात विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येकवेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार, अशी चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून वंचित राहतात. आतादेखील त्यांच्यासोबत हेच घडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि संघ परिवरातील जुन्या-जाणत्यांच्या वर्तुळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल.