सांगरूळ /वार्ताहर:
आषाढीवारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागात दिंडी सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे . वाहनाची तयारी पिण्याचे पाणी जेवणाचे साहित्य जमा करण्यात दिंडीचे कार्यकर्ते व्यस्त असल्याचे दिसत आहे .
ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी बुधवार दिनांक १९ जूनला आळंदीतून पंढरपूरला प्रस्थान करणार आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील दिंड्या मंगळवार दिनांक १८ जून रोजी आळंदी कडे प्रस्थान करणार आहेत
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावागावातील दिंड्या दरवर्षी आळंदी ते पंढरपूर दिंडी सोहळ्यात सहभागी होत असतात . ह भ प वैकुंठवासी तात्यासाहेब वासकर महाराज यांना मानणारा संप्रदाय या भागात मोठ्या प्रमाणात आहे . परिसरातील पन्नास पासून शंभर सव्वाशे महिला व पुरुषांचे गट या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात .
जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर या सोहळ्याच्या तयारीची लगबग सुरू होतात .वर्षभर आपापल्या कामात व्यस्त असणारे कार्यकर्ते एकत्र येतात .आणि नियोजन करत तयारीची लगबग सुरू होते . पंधरा ते वीस दिवस दिंडी सोहळा असतो .या कालावधीत पुरेल एवढे जेवणाचे साहित्य पिण्यासाठी व जेवणासाठी ग्रुप मधील लोकांना पुरेशी पाणी साठवण्याची टाकी इंधन जेवणासाठी आवश्यक भांडी इत्यादी साहित्याची जमवाजमव केली जाते .प्रवासासाठी ट्रक अगर ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातो .या लोकांना बसण्यासाठी ट्रकमध्ये बैठक व्यवस्था करणे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षणासाठी छताची व्यवस्था करणे .तसेच विसाव्याच्या ठिकाणी व मुक्कामाच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी पाल उभा करणे यासाठीचे लागणारे साहित्य जुळवा जुळव करून ट्रक अगर ट्रॉलीत व्यवस्थित भरणे ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत .
अनेक भाविक धान्य व आर्थिक रूपाने मदत करत असतात .सध्याच्या महागाईमुळे आर्थिक गणित जमवणे सुद्धा तारेवरची कसरत आहे .यासाठी सहभागी होणारे ग्रुप मधील सर्व सदस्य वर्गणीच्या रूपाने खर्चाची रक्कम जमवाजमव करतात . एकंदरीत सध्याच्या आधुनिकतेच्या युगातही मोठ्या भक्ती भवाने हा पायी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वजण मनापासून प्रयत्नशील राहतात .