Tuesday, June 9, 2026
HomePoliticalशक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर , महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी

शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात हजारो शेतकरी रस्त्यावर , महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी

कोल्हापूर, दि. ९ जून : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात मंगळवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. “एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द” अशा जोरदार घोषणांनी कोल्हापूर शहर दणाणून गेले. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत “रक्ताचे पाट वाहतील, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही” असा इशारा दिला. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत महामार्गाविरोधातील एकजूट दाखवून दिली.

या मोर्चात खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी “गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा” अशी जोरदार मागणी केली. अनेक महिला शेतकऱ्यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. “मोबदला पिशवीत भरायचा काय? शेतीच पाहिजे, पैसे नकोत. मुलांना नोकऱ्या नाहीत, खायचं काय?” असा सवाल एका महिला शेतकऱ्याने उपस्थित केला. “आम्हाला मोबदला नको, आमची जमीन आम्ही देणार नाही,” अशी भूमिका अनेक शेतकऱ्यांनी मांडली.

मोर्चा रोखण्यासाठी शासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. “हा मोर्चा निघू नये यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये शेतजमिनींची मोजणी सुरू आहे. शेतकरी मोर्चाला आल्यानंतर मोजणी का केली जाते? हिंमत असेल तर शेतकरी असताना मोजणी करा,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, राजू शेट्टी यांनीही सरकारवर टीका करत केवळ ५० हजार कोटी रुपयांच्या लाभासाठी हा महामार्ग लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

ही धार्मिक स्थळे जोडली जाणार    

या सुधारित मार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे व धार्मिक स्थळे अत्यंत कमी अंतरात जोडली जाणार आहेत. त्यामध्ये माहूर (रेणुकामाता), औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर महालक्ष्मी, पन्हाळा- ज्योतिबा, माहूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी असे इतर अनेक धार्मिक स्थळांनाही सुलभ जोडणी मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ७३ गावांमधून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग जाणार असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर बागायती जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular