कोल्हापूर :
कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. राज ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्त नूतन संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार व नंदकुमार चिले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की, राज ठाकरे यांचा लवकरच कोल्हापूर दौरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे. तसेच प्रत्येक पदाधिकाऱ्याने दर महिन्याला आपला कामाचा अहवाल ऑनलाइन स्वरूपात सादर करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कामात निष्क्रिय राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नंदकुमार चिले यांनीही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक पुनर्रचना करण्यावर भर दिला. “मनसेची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रिय व्हावे. समाजोपयोगी कामांच्या माध्यमातून राज ठाकरे यांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा,” असे त्यांनी आवाहन केले.
या मेळाव्यास जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, दौलत पाटील, नागेश चौगुले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, अभिजीत राऊत, प्रताप पाटील, रवी गोंदकर, राजेंद्र चव्हाण, निलेश धुम्मा, राजू पाटील, अभिजीत पाटील, संजय चौगुले, विजय करजगार, अमित पाटील, प्रभात साबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे या मेळाव्यातून स्पष्ट झाले.