जयसिंगपूर ( प्रतिनिधी):
गत गळीत हंगामात तुटलेल्या ऊसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाले आहेत.
यंदा साखर विक्री मध्ये बाजारात तेजी असून वर्षभर साखरेला चांगला भाव मिळाला आहे. यामुळे गत हंगामात तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ३०० रूपये दुसरा हप्ता द्या अशी मागणी दत्त शिरोळ , जवाहर , गुरूदत्त , पंचगंगा या कारखान्यांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
चालूवर्षी ऊस उत्पादक शेतकरी वाढलेले खताचे व औषधांचे दर , ऊसतोडणी मजूर व वाहतूकदार यांचेकडून ऊसतोडणी साठी झालेली पिळवणूक , वाढलेली मजूरी यामुळे शेतकरी आर्थिक आरिष्टात सापडला आहे.
गेल्या दोन महिन्यात साखरेचे दर चांगल्या पध्दतीने वाढत असून पुढील दोन महिने साखर तेजीत विकली जाणार आहे. यामुळे साखर कारखान्याकडून गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसास प्रतिटन ३००/- रूपयांचा दुसरा हप्ता तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली.
जर कारखान्यांनी सदर प्रतिटन ३००/- रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झालेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून बाहेर पडणारे साखर व उपपदार्थ रोखण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राजाराम देसाई , सचिन शिंदे , राम शिंदे , तानाजी वठारे , विशाल चौगुले , बंडू पाटील , पुरंदर पाटील , कलगोंडा पाटील , मिलींद कोले , धुळगोंडा पाटील ,श्रीकांत पाटील यांचेसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ व हातकंणगले तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.