वेळापूर ( प्रतिनिधी):
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग देवांच्या नावाखाली अदानीसारख्या महादेवासाठी केला जात आहे. देवदेवतांच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपतींच्या समोर लोटांगण घालून गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील जनतेवर १ लाख कोटींचा बोजा टाकत असून शक्तीपीठ महामार्ग हद्दपार केल्याशिवाय राज्यातील जनता स्वस्थ बसणार नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर येथे झालेल्या शक्तीपीठ विरोधी जनआक्रोश मेळाव्यात बोलताना केले.
नव्याने होत असलेला शक्तीपीठ महामार्ग आता माढा तालुक्यातील १२ व पंढरपूर तालुक्यातील ६ गावांतून व माळशिरस तालुक्यातील १२ गावांतून हा महामार्ग सातारा जिल्ह्यात जातो. सोलापूर जिल्ह्यातील माढा , पंढरपूर व माळशिरस या तीनही तालुक्यांतील गावांमध्ये द्राक्षे , ऊस , केळी , भाजीपाला यासारखी नगदी पिके घेतली जातात. याठिकाणी शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होवू लागला आहे. सध्या या सर्व गावांना कोल्हापूर , सातारा व नागपूर ला जाण्यासाठी पर्यायी रस्ते आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी पालखी महामार्गास , रत्नागिरी -नागपूर महामार्गास व होणाऱ्या विकासकामास कधीही विरोध केला नाही. मात्र गरजेचा नसलेला आणि राज्यातील जनतेवर १ लाख कोटी कर्जाचा बोजा टाकून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग देवांच्या नावाखाली अदानीसारख्या महादेवासाठी केला जात आहे. या महामार्गाचा टोल किमान पुढील ९० वर्षे वसुली होण्यास कालावधी लागणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग हा एक्सप्रेस हायवे असणार आहे. या महामार्गास दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत असून फक्त २३ ठिकाणी या महामार्गावर ये -जा करता येणार आहे. यापूर्वी संपादित केलेल्या पालखी महामार्गास , रत्नागिरी -नागपूर महामार्ग अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यावर झाल्याने शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला मात्र सध्याचा महामार्ग शेतजमीनीतून जाणार असल्याने त्याला मिळणारा मोबदला अत्यल्प प्रमाणात मिळणार आहे.