पन्हाळा प्रतिनिधी-पन्हाळ्यातून मसाई पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दुर्दम्य झालेली आहे.
सात वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात करून प्रवास करावा लागतोय. पर्यटन स्थळ असूनही सुविधा अपुऱ्या आहेत. निधी मंजूर असूनही या मार्गाचे काम रखडल्याने आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मसाई पठाराकडे जाणारा मुख्य रस्ता गेल्या सात वर्षांपासून अत्यंत दैनिया अवस्थेत असून ग्रामस्थांसाठी तो जीव घेणा ठरत आहे. पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या पठारावर दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबरी भाग आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवास करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या मार्गावर दाट जंगल परिसर आणि अपुरी प्रकाश व्यवस्था असल्याने अपघाताचा मोठा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे .
पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होत असून अनेक ठिकाणी चिखल आणि पाण्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असते. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही वन विभागाकडून परवानगी मिळत नसल्यामुळे काम सुरू होत नसल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असून लवकरात लवकर काम सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मंजूर निधी वेळेत खर्च झाला नाही तर तो परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक परवानगी मिळवाव्यात आणि रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.