Friday, May 15, 2026
HomePoliticalपरमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो,मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो,मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

वंदूर, दि. १५:
परमेश्वरावरील गाढ श्रद्धेमुळेच माणूस माणसात राहतो अन्यथा तो हैवान बनला असता, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या भावनेतूनच माझ्या हातून साडेनऊशेहून अधिक मंदिराचा जिर्णोद्धार व बांधकामे झाली, असेही ते म्हणाले.

वंदूर ता. कागल येथे श्री. विठ्ठल- रुक्माई मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा वास्तुशांती सोहळा उत्साहात झाला.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या मंदिरांच्या वास्तुशांती सोहळ्यानिमित्त संपूर्ण गाव एक झाला ही मनाला आनंद देणारी बाब आहे. गेल्या 35- 40 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मला अनेक चांगली कामे करता आली. त्यापैकीच अत्यंत समाधानकारक काम म्हणजे साडेनऊशेहुन अधिक मंदिराची उभारणी आणि जिर्णोद्धार केले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, देवाबद्दल वेगवेगळे विचार आणि मतप्रवाह आहेत. आस्तिक- नास्तिक असे लोकांचे प्रकार आहेत. परंतु; एक शक्ती हे जग चालवते यावर माझा गाढ विश्वास आहे. मानवाचा जन्म होतो, मृत्यू होतो व त्याच्या जीवनात बऱ्यावाईट घटना घडतात. यापैकी काहीच आपल्या हातात नसते. हे सगळं घडविणारी एक शक्ती आहे, त्यालाच आपण परमेश्वर म्हणतो. या परमेश्वरावर जर मानव जातीची श्रद्धा नसती तर मानव हैवान बनला असता. देवालयांचे यश मी यामध्ये बघतो की, मंदिरांमधून माणसं भजन करत आहेत, कीर्तन करत आहेत. त्यामुळेच समाजात सदाचार आणि सलोखाही वाढत आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या निमित्ताने कोट्यावधी लोक श्री. विठ्ठल- रुक्मिणीच्या ध्यासाने पायी चालत असतात. जगामधील ही अशी एकच गोष्ट आहे की, जिला मॅनेजमेंट नाही. भक्तीच्या निर्मळ भावनेतूनच ही वारी सुव्यवस्थित पार पडत असते.

*अलौकिक मंदिर…!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, वंदुरकर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर आखीव-रेखीव मंदिर साकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती- धर्मांच्या मावळ्यांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातली. रयतेची राज्य कसे असावे आणि जनतेसाठी कसे जगावे, याचा आदर्श वस्तू पाठ घालून दिला. या मंदिरासाठी आवश्यक असलेला आणखी निधीही देऊ.

जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती व गोकुळ दूध संघाचे माजी संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, वंदुरकर ग्रामस्थांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदिराबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर साकारले. या मंदिरांच्या उभारणीतून व या सोहळ्यातून वंदूर गावाने गावाचा एकोपा कसा असतो, हे दाखवून दिलेले आहे. नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात नऊशेहून अधिक मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले आहे.

यावेळी व्यासपीठावर गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, शिवसिंह घाटगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. दिपाली घाटगे, वंदूरच्या सरपंच सौ. धनश्रीदेवी घाटगे, उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञा कांबळे यांनी केले. आभार उत्तम कांबळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular