नानीबाई चिखली, दि. १७:
कोल्हापूर जिल्हा ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या भूमीत हिंदू धर्माच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे बांधणारे मंत्री हसन मुश्रीफ जिहादी कसे? असा रोकडा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी केला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश बेलवाडे याच्याकडून जर हा धर्मवाद, जातिवाद पेरला जात आहे. हे असले प्रकार चालू देणार नाही, असेही ते म्हणाले.
नानीबाई चिखली ता. कागल येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. कांबळे बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावर सतत जातीयवादी आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे याच्या जातीयवादी वक्तव्यांचा संदर्भ घेत श्री. कांबळे पुढे म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सर्वधर्मसमभाव या न्यायाने राजकारण आणि समाजकारण केले. तुम्ही ज्यांना जिहादी म्हणता त्यांनी हिंदूंच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे उभारली आहेत. मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होत सगळ्याच देव देवतांच्या पूजेलाही ते बसले आहेत. एवढ्या मोठ्या मनाचा आमदार आम्हा जनतेला लाभलेला असताना तुम्ही त्यांना जिहादी कसे म्हणता? अशा जातीयवादी विचारांच्या माध्यमातून संविधानच मोडून काढायचे काम होत असेल तर आपण स्वस्थ बसता कामा नये. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत वर्षाला दिलेले संविधान आणि महामानवांचे विचारच तुम्हा- आम्हाला तारणारे आहेत.
*शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांना काळीमा….*
श्री. कांबळे पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. या समतावादी जिल्ह्यात जाती- धर्माच्या नावाने कोणी विद्वेष पेरत असेल तर तो शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांना काळीमा फासल्यासारखे आहे. काही अपप्रवृत्तींकडून या महापुरुषांच्या विचारांचा खून होत असेल तर हा जिल्हा कदापिही सहन करणार नाही. महामानवांचा विचार कलंकित होता कामा नये.

