कोल्हापूर/ दोनवडे : श्रीकांत पाटील
मे महिना नाही तर अजून पण संपत आला तरीही मान्सूनची सुरुवात झालेली नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा सर्वात सुजलाम सुफलाम राहिला आहे पण ऐन जून महिन्यात कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात पाणी संकट ओढवले आहे. कोल्हापूर शहरालाही पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागली. उपसा बंदीमुळे पूर्ण शेतीच धोक्यात आली आहे. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासन मात्र नुसत्या घोषणाच करत सुटले आहे. सातबारा कोरा करतो, पीक कर्ज भरा तुम्हाला ५० हजार ₹ देतो अशी आश्वासनेच करत राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
मागील वर्षी पावसाने धुवांधार केली. पूर्ण क्षमतेने धरणे भरली. आता हेच पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवले आहे. शेतीसाठी उपसा बंदी केली आहे. भात, ऊस व भुईमूग यासारखी पिके वाया जाण्याची शक्यता आहे. धुळवाफ भात पेरणी झाली पण पावसाने हेलकावणी दिली असल्याने शेतकरी संकटात आला आहे. दोन दिवस नदीला पाणीच नसल्याने पिके वाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसच नसल्याने रानमाळ व शिवारात चिटपाखरूही दिसत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात कधी नव्हते ते मोठे संकट ओढवले आहे.
मान्सून केरळच्या सीमेवर येऊन पोहोचला आहे. पंधरा राज्यात पाऊस दमदार सुरु होईल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे त्यात महाराष्ट्राचे नावच नाही मग नुसत्या वळीव सारख्या पावसाचाच भरवसा राहिला आहे. राज्यात मान्सून लागणार की नाही असेही तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.