सेनापती कापशी, दि. २४:
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने गेल्या गळीतात आलेल्या ऊसाला शेवटचा हप्ता म्हणून प्रतिटनाला रु. १०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना श्रावण महिना, श्री. गणेशचतुर्थी, दसरा व दिवाळी या सणांकरता हे पैसे मिळावेत, ही भावना असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. मंगळवार दि. एकपासून आपापल्या बँक खात्यातून शेतकऱ्यांनी उचल करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
या पत्रकात श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, गत गळीत हंगाम म्हणजेच सन २०२५-२६ चालू होण्यापूर्वी ठरलेल्या तोडग्यानुसार प्रति टनाला रु. ३४०० पहिला हप्ता आणि उर्वरित रू.१०० चा हप्ता हंगाम संपल्यानंतर, असे प्रति टनाला रु. ३५०० जाहीर केले होते. कारखान्याने गेला गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला असून या हंगामात ६,०२,६९८ मेट्रिक टन इतक्या ऊसाचे गाळप करून सरासरी १२.४०% च्या साखर उताऱ्याने ६,७०,६५५ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. को-जन प्रकल्पातून आठ कोटी, ८७ लाख युनिट्स वीजनिर्मितीपैकी सहा कोटी, ७९ लाख युनिट्स वीज निर्यात केली आहे. तसेच; आसवणी प्रकल्पातून एक कोटी, ६० लाख लिटर्स इथेनॉल व स्पिरीट उत्पादित केले आहे.
*दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट…….!*
चालू म्हणजेच सन २०२६-२७ या हंगामासाठी दररोज ६,००० मेट्रिक टनावरून ८,००० मेट्रिक टन गाळप क्षमतावाढीचे काम चालू आहे. येणाऱ्या गळीत हंगामात वाढीव गाळप क्षमतेसह १० लाख मेट्रिक टन ऊसाचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच; सध्या कार्यरत असलेल्या इथेनॉल प्रकल्पामध्ये रेक्टिफाईड स्पिरीट आणि ई.एन.ए चे उत्पादन घेण्याकरीता आसवणी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कामही कारखान्याने हाती घेतले आहे.
*ऊत्पादन वाढीसाठी ए. आय. वापरा…….!*
श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे, कारखान्याने चालू हंगामात २०० एकरावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ऊस लागवड केली आहे. येणाऱ्या ऊस हंगामात एक हजार एकरावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून ऊस लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या माध्यमातून ऊस लागवडीकरता शेतकऱ्यावर पडणारा आर्थिक भार कारखाना व केडीसीसी बँक उचलणार आहे. ए. आय. च्या वापरासाठी सर्व माहिती आणि मार्गदर्शनाचे काम कारखान्याचा शेती विभाग समर्थपणे पार पाडेल. जास्तीत- जास्त शेतकऱ्यांनी ऊस शेतीमध्ये AI चा वापर करावा. येत्या हंगामात १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस सरसेनापती साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंतीही कारखाना प्रशासनाने केली आहे.

