कोल्हापूर दि१५:महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करवीर तालुक्यातील १३ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सूर असलेल्या कामांची गती वाढविण्यात यावी असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले .
या कामाचाआढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जॅस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
ते म्हणाले ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या ३४३ कोटी रुपयांच्या योजनेमुळे परिसरातील १३ गावांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याचा लाभ होणार आहे.केवळ निधी वेळेत प्राप्त न झाल्यामुळे कंत्राटदारांनी या कामांमध्ये अजिबात हयगय करू नये.मंत्रालयस्तरावर उर्वरीत निधी लवकरात लवकर देण्याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी या आढावा बैठकी प्रसंगी दिली तसेच उर्वरित काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देताना या कामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.सध्या सुरु असलेल्या या कामांमध्ये निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रसंगी दिला.
दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी.के.पाटील यांनी या योजनेचे सुमारे ५१ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी.के.पाटील, उपअभियंता पी. एच. गायकवाड यांच्यासह संबंधित ठेकेदार उपस्थित होते.