बालिंगा | प्रतिनिधी
विठ्ठलाच्या भेटीची आस मनी धरून टाळ मृदूंगाच्या तालात तल्लीन होऊन आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करण्याची परंपरा बालिंगा येथील अत्तार कुटुंबीयांनी गेल्या तब्बल ३५ वर्षांपासून अखंडपणे जपली आहे. श्रद्धा, सेवा आणि माणुसकीचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम परिसरात आदर्श ठरत आहे.कोल्हापूर – गगनबावडा
मार्गावरून जाणाऱ्या नागदेववाडी येथील वारकऱ्यांसाठी दरवर्षी अत्तार कुटुंबीयांकडून चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून संतांनी घालून दिलेली शिकवण जात भेद न मानता आम्ही ही परंपरा कायम चालू ठेवली आहे. असे राजू अत्तार यांनी सांगितले.कोणताही दिखाऊपणा न करता केवळ विठ्ठल भक्ती आणि सेवाभाव या उद्देशाने वडिलांपासून सुरू झालेली ही परंपरा आज ३५ वर्षांनंतरही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे.
या सेवेमुळे अत्तार कुटुंबीय आणि वारकरी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असून, अनेक वारकरी दरवर्षी त्यांची आवर्जून भेट घेतात. “वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा” या भावनेतून सुरू असलेल्या या सेवाकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.समाजात सेवा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा अत्तार कुटुंबीयांचा हा ३५ वर्षांचा ऋणानुबंध पुढील पिढीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.