नवी दिल्ली, प्रतिनिधी : विविध प्रलंबित मागण्यांसाठी BSNLEUचे कार्यरत कर्मचारी, AIBDPAचे निवृत्त कर्मचारी आणि CCWFचे कंत्राटी कामगार यांनी शुक्रवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मुसळधार पावसातही ठिय्या आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले.
देशभरातून सुमारे १,५०० कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले असून, पावसाची पर्वा न करता आंदोलन सुरू ठेवण्यात आले. यावेळी कॉम्रेड जयराज, कॉम्रेड अनिमेश आणि कॉम्रेड मुरलीधरन नायर यांनी उपस्थितांना संबोधित करत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सविस्तर भूमिका मांडली. तसेच सरकारने कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी ही लढाई केवळ कर्मचाऱ्यांची नसून सर्व कामगारांच्या हक्कांची आणि न्याय्य मागण्यांची असल्याचे सांगितले. “हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील,” असा निर्धार व्यक्त करत आंदोलनस्थळी “एकजूट जिंदाबाद” आणि “कामगार एकता जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या.
मुसळधार पावसातही आंदोलनाचा उत्साह कायम राहिल्याने कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.