मुंबई ( प्रतिनिधी):
राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ॲानलाईन करण्यासंदर्भात राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी राज्याचे वैद्य मापन विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांचेकडे केली.
राज्यातील साखर कारखान्यामध्ये सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करून ऊस उत्पादक शेतक-यांची लुबाडणूक केली जात आहे. चालू गळीत हंगामात तर सरासरी एकुण गाळप झालेल्या ऊसाच्या १० ते १५ टक्के वजनात घट आलेली आहे. काटामारी बरोबर रिकव्हरी चोरी करण्याचे प्रमाणही वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी , वाहतूकदार व ऊस तोडणी मजूर दुहेरी संकटात सापडले आहेत. यामुळे राज्यातील सर्व साखर कारखान्याच्या बाहेर राज्य सरकारने संबधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी , साखर सहसंचालक , उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक , वजनमापे नियंत्रक यांच्या नियंत्रणात वजनकाटा उभारण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
सदर वजनकाटा उभा करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा याकरिता आमदार -खासदार स्थानिक विकास कार्यक्रम , जिल्हा नियोजन नाविन्यपूर्ण निधी किंवा शासनाकडे पैसे उपलब्ध नसतील तर संबंधित कारखान्याच्या गाळप झालेल्या ऊसातून वजनकाट्याच्या खर्चाची रक्कम शेतक-यांकडून प्रतिटनाप्रमाणे समान कपात करून घेण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यामध्ये राज्य सरकारचे स्वतंत्र वजनकाटे बसविले जातील व सदर वजनकाटे डिजीटल व ॲानलाईन प्रणालीने शासनाच्या मुख्य सर्व्हरला जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.साखर कारखान्यांचे वजनकाटे ऊभारणी करत असताना ट्रक अथवा ट्रॅक्टर वजन काट्यावर गेल्यानंतर वजन होत असताना त्यामधील ज्या त्रुटी आहेत त्याची पुर्तता केली जाणार आहे. ऊसाने भरलेले प्रत्येक वाहन या वजन काट्यावर वजन केल्यानंतर त्याचा मेसेज थेट संबंधित शेतकऱ्यांना दिला जाईल.