कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून विविध राजकीय पक्ष व नेत्यांकडून हालचालींना वेग आला आहे. गोकुळवरील सत्ता मिळवण्यासाठी मुंबईपासून राजकीय खेळी खेळकी जात आहे.
भाजपला गोकुळ मध्ये सत्ता हवी आहे पण त्यासाठी महायुतीचे लेबल लावले आहे
यापूर्वी गोकुळच्या कारभाराकडे राज्यस्तरीय नेतृत्वाने फारसे लक्ष दिले नव्हते परंतु यंदाच्या निवडणुकीत मात्र मोठी राजकीय ताकद भाजपकडून लावली जात आहे. दोन्ही आघाडीकडून ठराव गोळा करण्यासाठी आणि मतदारांशी संपर्क वाढवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहे.
काही ठिकाणी नोकरीचे आश्वासन, आर्थिक आमिष तसेच दबावतंत्र वापरले जात असल्याचे आरोपही राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. गोकुळसारख्या नावाजलेल्या दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकासआघाडीच्या राजकारणाचा प्रभाव टाकला जात आहे.
निवडणूक लढवण्याची पैसा, राजकीय दबाव आणि स्थानिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बोगस मतदारांच्या मुद्द्यावरूनही वातावरण तापले असून या संदर्भातील वाद अद्याप पूर्णपणे संपलेला नसल्याचे स्पष्ट आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया काही ठिकाणी व्यक्त होत आहे.