कोल्हापूर:
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी मेळाव्यास युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३९ नामांकित कंपन्यांचा सहभाग असलेल्या या मेळाव्यातून ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
गरजू विद्यार्थी तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तब्बल ६१० उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी ३०० हून अधिक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून त्यांना पुढील कार्यालयीन व अंतिम मुलाखत प्रक्रियेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, रोजगाराच्या संधी आणि भविष्यातील करिअरच्या दिशा याविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर भर देत स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी केले.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून मेळाव्याच्या उद्दिष्टांची माहिती दिली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा अधिक बळकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष रोटेरियन राहुल कुलकर्णी यांनी रोटरीच्या जागतिक कार्याचा आढावा घेतला. सामाजिक बांधिलकी जपत रोजगारनिर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्टच्या सीएसआर विभागाच्या डेप्युटी मॅनेजर माधुरी मुसळे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व कौशल्यविकास उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी आभार मानले.

