कोल्हापूर:
करवीर, पन्हाळा आणि कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदीकाठच्या व विहिरींवरील पाणी उपसा मोटारी चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा करवीर पोलिसांनी छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या २१ पाणी उपसा मोटारी, गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी सुनील सुभाष जाधव (रा. आळते, सांगली), सुरज बाळू लोखंडे (रा. रुकडी, कोल्हापूर), सुरज संपत गुजले आणि हर्षद विकास पाटोळे (दोघे रा. रेणावी, सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. कुंभी नदीकाठी कोपार्डे येथील बळीराम पडवळ यांची मोटार चोरीला गेल्याचा तपास करत असताना करवीर गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वडणगे फाटा येथे सापळा रचून पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारची (क्रमांक MH-12-DS-9886) झडती घेतली असता, त्यात चोरीच्या मोटारी आढळल्या.
संशयितांनी करवीर, पन्हाळा व कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २१ मोटारी चोरल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार आणि पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. न्यायालयाने आरोपींना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.